Saturday 20 January 2024

आनंदवल्ली (सामस्वरा)

 🍁🍁


संदर्भ : कथामंजिरी२/५१


शतानंदांची पत्नी व  भृगुकन्या असणारी आनंदवल्ली अर्थात् सामस्वरा सदैव १९ (एकोणीस) वर्षे वयाच्या रूपातच असते.
व ही  सामवेदाची सर्वोच्च साधिका
मानली जाते.

हिच्या भजनाच्या आवडीतून,हिची गायनकला आपोआपच समृद्ध होत गेली.

हिला हिची कन्या,  प्रशांतीच्या वेळेस याज्ञवल्क्यांच्या आश्रमात राहण्याचे डोहाळे लागले होते.म्हणून याज्ञवल्क्यभार्या कात्यायनीने तिला तेथे बोलावून घेतले.

तिथे पोहोचताच आनंदवल्लीला कात्यायनीचा
निरोप मिळाला की,ते सर्वजण नजिकच्या ग्रामात
एका संगीतसभेसाठी गेले आहेत.परंतु ब्रह्मर्षि याज्ञवल्क्य मात्र येथेच कुठेतरी ध्यानाला बसले आहेत.माता कात्यायनी येईपर्यंत तुम्ही तिची वाट पाहावीत.

इतर स्त्रिया थोड्या अंतरावर विसावल्या.
आनंदवल्ली मात्र बालरामभद्राचे स्वरूप तिच्या मनात आठवत आठवत व त्याच्या लीलांचे वर्णन
करणारी गीते गुणगुणत आश्रमपरिसरात हिंडू
लागली.तिला ओढ लागली होती त्या बालत्रिविक्रमाला पाहण्याची आणि तिला आतून खात्री वाटत होती  की तो बालरामभद्र इथेच कुठेतरी जवळपास आहे.

ती भानरहित अवस्थेत मंत्रगजर करू लागली.

आधीच हा महामंत्र असणारा मंत्रगजर सर्व सुंदर गुणांनी युक्त,मधुर,सर्व शक्तींनी परिपूर्ण,साक्षात्
स्वयंभगवानाची कृपाच स्वतःबरोबर घेऊन येणारा
आणि दुसऱ्या बाजूस आनंदवल्लीचा उत्कृष्ट भक्तिभाव आणि तोसुद्धा अगदी रसरशीत,जिवंत,
आणि चैतन्याने भरलेला. त्यामुळे तो मंत्रगजर मग सर्व आसमंतात क्रीडा करू लागला.

त्या मंत्रगजराच्या ध्वनीने आश्रमातल्या
पशुपक्ष्यांपासून दगडधोंड्यापर्यंत
प्रत्येकाला जणू गायला शिकविले.चहूबाजूंनी
फक्त तो मंत्रगजरच ऐकू येत होता.आणि
संगीतध्वनी अत्यंत सुरेल होता.
मुद्दामहून गुप्तपणे बसलेले ब्रह्मर्षि याज्ञवल्क्य ते
सर्व पाहून अत्यंत प्रसन्न झाले.व त्यांनी तेथेच
लपून राहिलेल्या कात्यायनीस व मैत्रेयीस बाहेर येण्यास सांगितले व ते स्वतः ही प्रकट झाले.

महामती कात्यायनी सामवेदात निष्णात होती.म्हणून याज्ञवल्क्यांनी कात्यायनीस आनंदवल्लीबरोबर चालत राहून सामगायन करण्यास सांगितले.

कात्यायनीने  सामगायन सुरु करताच आनंदवल्लीने
दोन्ही कानात फुले कोंबून कान बंद करून घेतले.
कारण तिला मंत्रगजर सोडून काहीही ऐकावयाचे
नव्हते.खरंतर तिला सामवेदाच्या गायनाचे अत्यंत वेड होते.परंतु महामती कात्यायनीस पाहताच
ती लज्जित झाली.
ती कात्यायनीला  म्हणाली, 'तू स्वतः मला सामवेद शिकवित असताना मी कानात बोळे घालून बसले.
माझी मोठी चूक झाली .मला कुठलीही शिक्षा दे.'

तेव्हा याज्ञवल्क्यांच्या सांगण्यानुसार कात्यायनीने तिला सांगितले की, ' हे आनंदवल्ली! तुला एकतर
रौरव नरकात पडण्याची शिक्षा भोगावी लागेल आणि ते नको असेल तर मंत्रगजर कायमचा
सोडून द्यावा लागेल.

आनंदवल्लीने अत्यंत निश्चयपूर्वक व ठामपणे उत्तर दिले.हे श्रेष्ठ महामती कात्यायनीमाते!मी रौरव नरकात जन्मानुजन्मे राहण्यास तयार आहे परंतु मंत्रगजर मात्र सोडणार नाही.कारण मंत्रगजर सोडणे म्हणजे नरकाहून अधिक वाईट स्थिती;
आणि स्वार्थ कुणाला सुटला आहे?

आणि मुख्य म्हणजे माझा पूर्ण विश्वास आहे की हा मंत्रगजर अर्थात स्वयंभगवानाचा दिव्य महामंत्र कुठल्याही नरकाचे रूपांतर पवित्र भूमीत करू शकतो.

माझे एकटीचेच काय ;परंतु सर्व विश्वाचे पाप हरण्याची ताकद ह्या गजरात आहे असे मला माझा पिता ब्रह्मर्षि भृगु ह्यांनी सांगितले आहे.व माता अहल्यादेखील नेहमी हेच सांगत राहते.

आणि तुझ्या चेहऱ्यावर मला जराही क्रोध दिसत नाही आजुबाजुच्या वृक्षवल्लीतून व दगडगोट्यांतून निघणारा मंत्रगजराचा ध्वनी तू एका दृष्टिक्षेपात बंद
करू शकतेस.तू तेही केले नाहीस.

उलट मी स्वतः पाहते आहे,तुझे ओठ मंत्रगजरच करीत आहेत.ह्याचा अर्थ काय ते मला कळत नाही.
एवढे बोलून आनंदवल्लीने कात्यायनीची चरणधूळ
मस्तकी लावली

व त्याबरोबर ब्रह्मर्षि याज्ञवल्क्य आनंदवल्लीच्या मस्तकावर हात ठेवून म्हणाले,
कन्ये सामस्वरे!
तू आपोआपच सामवेदात प्रवीण झालेली आहेस.
कात्यायनीलाही तू मागे टाकले आहेस.

तुझा भजनस्वर इतका मधुर आहे व तुझा भावही इतका मधुर आहे की,पाषाणामध्येही भक्ती तयार होईल म्हणून माझे तुला वरदान आहे की तू सदैव आता आहेस त्याच वयाची राहशील --अर्थात् १९ वर्षांची.
आणि कलियुगात तर तू प्रत्येक त्रिविक्रम स्थानावर
एकाच वेळेस राहून तेथील प्रत्येकाचे मंत्रगजराचे
गायन सुमधुर करून टाकशील."

तेव्हा याज्ञवल्क्यांच्या खांद्यावर बसलेला  बालत्रिविक्रम टाळ्या वाजवून आनंदवल्लीस म्हणाला,
"आनंदातून निर्माण झालेला आनंदमय असणारा,
आनंद श्रद्धावानांकडे प्रवाहित करणारा असा हा मंत्रगजर तू रोज सकाळी ब्राह्यमुहूर्ताच्या वेळेस गात गात विश्वसंचार करशील व भक्तिभावाचा पंचप्रवाह तुझ्या पोटी जन्म घेईल."

No comments:

Post a Comment