Friday, December 20, 2024

स्वयंभगवानाच्या कृपेशिवाय माणूस अपूर्ण आहे ( Discussion Notes )

 🌻कथा मंजिरी ४/१/२४


भगवंताची कृपा म्हणजे काय? 

सत्यप्रवेश चरण २७ मध्ये बापूंनी हे सविस्तर सांगितलेले आहे.


त्यावरून माझ्या अल्पबुद्धीला जे बापू कृपेने आकळले ते असे आहे.

👇

त्याच्या सहाय्याशिवाय म्हणजेच त्याच्या

कृपेशिवाय माणूस अपूर्ण आहे.

माणसाचे बळही अपूर्ण आहे आणि यश ही अपूर्ण आहे.


माणूस अपूर्ण आहे, हे आपण अनुभवू शकतो.

अगदी प्रत्येक सत्कर्म करताना त्याच्या अधिष्ठानाने केलेले कर्म व त्याला न स्मरता केलेले कर्म ह्यांच्या

यशात  किती तफावत असते ते आपण रोजच्या दैनंदिन जीवनातसुद्धा अनुभवत असतो.परीक्षा देत असताना तर जास्तच अनुभव घेतलेला असतो.


त्याचे साहाय्य मिळणारच हा आधार

व तो माझा उद्धार करण्यास समर्थ‌ आहेच  हा आत्मविश्वास.हे दोन्ही त्या भक्ताकडे असणे म्हणजे

त्या भक्तावर त्याची कृपा असणे.


कारण भक्ताला त्याचा वाटणारा आधार व भक्ताचा आत्मविश्वास त्या स्वयंभगवानानेच दृढ केलेले असतात. स्वयंभगवानाची कृपा असल्यावरच त्या भक्ताला ह्या गोष्टी आकळतात.


पण ती कृपा त्या भक्ताला प्राप्त होण्यासाठी त्या भक्ताने उचित श्रम करून कर्म करत असताना

प्रेमाने त्या देवाधिदेवाला, त्या स्वयंभगवानाला ,

त्या पूर्णाला आठवले पाहिजे.व त्याच्या त्या क्रियेला समग्रत्व म्हणजे पूर्णत्व मिळावे अशी

त्याला प्रार्थना केली की त्या भक्ताला आधार म्हणजे साहाय्य मिळतेच व त्याचा स्वयंभगवानावरचा विश्वासही दृढ झालेला असतो त्यामुळे त्याचा आत्मविश्वासही वाढलेला असतो.


त्याला आठवणे म्हणजे  ते नामस्मरण असेल,भजन असेल,मन:पूर्वक पूजन असेल, गजर असेल .जे भक्ताला आवडेल ते पण त्यात प्रेमळ भाव पाहिजे.त्याची स्मृती ठेवणे म्हणजेच त्याला आठवणे .


हे त्याला प्रेमभावाने आठवणे, आपली गरज झाली पाहिजे. जशी लक्ष्मणरावांना झाली.

म्हणून लक्ष्मणराव म्हणाले, आपण सगळेजण देवघरात बसून शांतपणे गजर करु या.


श्रद्धावानांना म्हणजे आपल्याला आपल्या  देवाधिदेवाने बापूरायाने,एक शाश्वत ग्वाही दिलेली आहे व तो पुन्हा पुन्हा सांगत असतो,

मी तुला कधीच टाकणार नाही.

हाच श्रद्धावानांचा सर्वात मोठा आधार आहे असे मला वाटते.

माझा देव माझ्या संकटापेक्षा मोठा आहे.


माझा देव माझ्या संकटापेक्षा मोठा आहे.

तो सर्वसमर्थ आहे. हाच फक्त मला माझ्या पापांपासून मुक्ती देऊ शकतो, हा आत्मविश्वासही श्रद्धावानांकडे असतो.कारण त्याला वेळोवेळी मिळालेल्या त्यांच्या साहाय्यामुळे, त्याला मिळालेल्या अनुभवामुळे त्यांच्या विश्वासाचे रुपांतर आत्मविश्वासात झालेले असते.व त्यासाठीच कृपासिंधू मासिक वाचायचे असते.त्याने इतर श्रद्धावानांना दिलेले अनुभव वाचल्यावर आपल्यालाही हे साहाय्य मिळू शकते हा भाव हा विश्वास वाढायला लागतो.व त्याच्या संकटाच्या वेळी  तसेच साहाय्य त्याला मिळाल्यावर त्या विश्वासाचे रूपांतर आत्मविश्वासात झालेले असते.


म्हणजेच श्रद्धावानांकडे त्याची कृपा आहेच.

बापूंचा आधार व बापूंनी वाढवलेला आत्मविश्वास हीच श्रद्धावानावर त्याने केलेली  कृपा आहे.


माझा भगवंत पूर्ण आहे म्हणूनच  तो आधार देऊ शकतो व माझ्यात जे कमी आहे ते देण्यास तो एकमेव  समर्थ आहे हा श्रद्धावानांचा भाव असतो.

म्हणून ते जीवनात सफल होतात व त्यांचा बापू राया त्यांच्या जीवनाचा विकास घडवत असतो.


श्रद्धावानाने  त्याला एकच सांगायचे आहे की

देवाधिदेवा बापूराया,

तू माझ्या जीवनात माझा उद्धार करण्यासाठी जे काही ठरवले आहे  तसंच घडव .

त्याच्या आड मी जरी आलो तरी मला बाजूला सारून तुला हवं तसं तू मला घडव.


पूर्ण असलेल्या स्वयंभगवानाच्या कृपेशिवाय 

त्याची प्रत्येक क्रिया त्याचे बळ व त्यांचे यश अपूर्णच असते.

म्हणजेच मानवाने त्याचे प्रत्येक कर्म पूर्ण असलेल्या स्वयंभगवानाच्या  अधिष्ठानानेच केलं पाहिजे तरच ते यशस्वी होते.जसे काशीनाथराव व गोजीबाईंचे कुटुंब करतात.


सत्यप्रवेश पान १८२ -१८३ मध्ये बापू सांगतात की,

👇

मानवी मनाने स्वतःच्या कर्मस्वातंत्र्याने उत्पन्न केलेली दारूण महाशक्ती म्हणजेच माया.

परमेश्वरी स्मृतीचा अभाव म्हणजे माया.

माया हीच स्वतः 'अ-भावातून' उत्पन्न होत असल्यामुळे ती माझ्या जीवनात फक्त अभावच उत्पन्न करू शकते.आम्ही मानव मात्र ह्या अभावजन्य मायेच्या सहाय्याने पूर्णता उत्पन्न करु पाहतो.

..... ही एकमेव गोष्ट अशक्यच नाही कां?

अभावातून पूर्णता कधी येते कां?


ह्याचाच अर्थ आमच्या जीवनात पूर्णता आणण्यासाठी आम्हाला त्या अस्तित्व असणाऱ्या,म्हणजेच भाव रुपाने असणाऱ्या परमेश्वराच्या स्मृतीचीच (श्रद्धेची) आवश्यकता आहे.

#######################


श्रीसाईसच्चरित

 सदैव संपूर्ण साई हा । ५०/२१


म्हणूनच संपूर्ण असलेल्या परमात्मा बापूंना आठवून सर्व कर्मे केली की त्याचा आधार अनुभवता येतो व आपल्या विश्वासाचे रूपांतर आत्मविश्वासात होते म्हणजेच आपला परमात्मा बापू वरचा  विश्वास परमात्मा बापूच  दृढ करतो.


त्याला आठवणे, त्याची स्मृती ठेवणे, म्हणजेच उठाउठी मंत्रगजर करणे व ही  देणगीही त्यानेच आपल्या बाळांना, श्रद्धावानांना दिलेली आहे.

Notes from 

Aniruddha's Agralekh Discussion Group (Telegram)

Wednesday, October 9, 2024

श्री महिषासूरमर्दिनीचे आख्यान: काव्य

श्री महिषासूरमर्दिनीचे आख्यान : काव्य

Image source : Wikipedia

ऐका ऐका जन हो सारे
कथा तुम्ही आदिमातेची
भक्तांना प्रिय असे सर्वदा
कहाणी श्री महालक्ष्मीची॥१॥


अशुभाचा जी नाश करी ती
अशुभनाशिनी तिज म्हणती
महिषासूरवध केला म्हणुनी
महिषासूरमर्दिनी म्हणती॥२॥


आरंभ कथेचा करूया आपण
ऋषी कश्यपां पासूनी
प्रतिरूप ब्रम्हर्षी मरिचीचे
 हेचि घेऊया जाणोनी॥३॥


भार्या दोन तयाच्या नामे
अदितीमति अन् दिती असती
श्रध्दावान अदितीमति तर
दिती असे सौंदर्यवती॥४॥


दिव्य तपोबल आदितीमतिचे
ईश्वरभक्ती तिच्या मनी
गुरूकुल आणिक पतिसेवेतून
जन्म घेतला देवांनी॥५॥


सात्विक तेज, पाहुनी सवतीचे
दिती पेटली द्वेषानी
क्रोध तिचा अन् मत्सर  मिळूनी
जन्म घेतला दैत्यांनी॥६॥


दितीपुत्र हिरण्यकष्यपु
त्यास विकल्पाने वरिला
कामुकता अन् भोग मिळोनी
अनुह्राद  दैत्य जन्मा आला॥७॥


दैत्येश्वर अन् विश्वनियंत्रक
वाटे व्हावे दैत्याला
याच राक्षसी इच्छेपोटी
महिषी आली जन्माला॥८॥


उन्मत्त होऊनी उन्मादाने
महिषीशी तो रत झाला
अनुचित अन् अपवित्र रतीतून
महिषासूर जन्मा आला॥९॥


जनक असे अशुभाचा आणिक
ढोंग आणखी कपटाचा
दुर्गुण पाहुनी हर्ष वाढला
दिती विकल्पा दोघींचा॥१०॥


मरिचींच्या यज्ञस्थळी जाऊनी
कपटाने वर मागितला
स्वकेश अर्पूनी यज्ञामध्ये
अजिंक्य महिषासूर केला॥११॥


पराभूत इंद्रासह केले 
त्या दैत्पाने देवांना
जिंकुनिया अवघ्या पृथ्वीला
गुलाम केले राजांना॥१२॥


देव धावूनी भर्गलोकी मग
परमात्म्यासी शरण आले
तारकमंत्राचा जप  करण्या
देवांसी हरिहर वदले॥१३॥


वृध्दिंगत होता जप सारे
अष्टभाव जागृत झाले
अंकुर-ऐश्वर्य प्रवाहित होऊनी
भर्गरुपाने अवतरले॥१४॥


आदिमातेचे तेज मिसळूनी
महातेज अतिदिव्य असे
त्या तेजातून प्रकट  होई जी
अभूतपूर्व आकृती दिसे॥१५॥


तिच असे जी ब्रम्हविलासिनी
महात्रिपुरांबा तिज म्हणती
अखिल विश्व तिज म्हणे ईश्वरी
हरिहर तिज आई म्हणती॥१६॥


त्या महालक्ष्मी रूपासी पाहुनी
सृष्टी आनंदुनी गेली
देवांनी तिज प्रतिक रूपांनी
दिव्य आयुधे अर्पिली॥१७॥॥


अष्टादश  आयुधे पाहुनी
हरिहर आनंदित झाला
देवीसिंहस्वरुप होऊनी
ॐ नमश्चन्डिकायै गर्जला॥१८॥


सिंहारुढ महालक्ष्मी माता
पृथ्वीतलावरी अवतरली
आश्रमात ती कर्दम ऋषींच्या
पवित्र स्थानी स्थिरावली॥१९॥


अतिपावन कतराज आश्रमी
पाऊल प्रथम तिचे पडले
म्हणोनीच मग कात्यायनी हे
नाम तिचे पारचलित झाले॥२०॥


आरंभ करोनी घंटानादा
मोहित केले असूरांना
करोनिया क्षीण बळ अशुभाचे
भयभीत केले दैत्यांना॥२१॥ 


महिषासूर भानावर आला
आज्ञा केली सैन्यासी
सेनापती आले ते करण्या
पराभूत आदिमातेसी॥२२॥


दुर्वृत्तींचे आगर असती
कपट तयांच्या ठायी वसे
प्रमुख असे असिलोमा त्यांचा
फितुरी ज्याचा प्राण असे॥२३॥


अष्टादश आयुधे रोखुनी
प्रहार मातेने केले
सेनापतींसी वधुनी त्यांना
यमसदनासी पाठविले॥२४॥


असिलोमा निःशस्त्र बनोनी
मातेवर धावूनी आला
प्राशुनी त्याच्या रक्ता तत्क्षणी
देवीसिंह मोदे गर्जला॥२५॥


महिषासूर युध्दात उतरला
नाश कराया मातेचा
विविध रूपे मायावी घेई
करी वापर तो कपटाचा॥२६॥


 महिष बनोनी महिषासूर तो
मातेवरी धावुनी गेला
मातेने बनवुनी ʼअग्नीकंकणा ʼ
बंदी त्यामाजी केला॥२७॥


वेगाने उड्डाण करोनी
कंठकुपावरी पाय दिला
त्रिशुल रोखुनी ह्रदयावरती
देह छिन्नविछिन्न केला॥२८॥


रक्षी शुभ अन् संपवी अशुभा
अद्भभुत कंकण गौरविले
ʼमणीभद्र ' असे त्या नाम देऊनी
धारण मातेने केले॥२९॥


सुरवर आणिक ऋषीमहर्षी
गर्जु लागले हर्षाने
जयजयकार करूनी मातेचा
उधळू लागले स्तुतीसुमने ॥३०॥


प्रसन्न होऊनी आदिशक्तीने
त्यांसी दोन वरां दिधले
शरण येऊनी हाक मारिता
सत्वर येईन वचन दिले ॥३१॥


जो कुणी गाईल तिचे स्तोत्र अन्
प्रेमाने आख्यान तिचे
नाश करील ती दुःखांचा अन्
वृध्दिंगत वैभव त्याचे ॥३२॥


हे आई वात्सल्यचण्डिके
हेचि मागणे मी मागे
जन्मोजन्मी मी गर्जावे
जय जगदंब जय दुर्गे !!
जय जगदंब जय दुर्गे!!॥३३॥


- डाॅ. प्रिया कर्णिक.

 ॥हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥ ॥नाथसंविध॥


श्री अशुभनाशिनी नवरात्राच्या निमित्ताने, मी आपणा सर्वांना, श्री महिषासूरमर्दिनीचे आख्यान, काव्यरुपात कथन करण्याचा प्रयत्न करते आहे. अर्थात या कवनातील प्रत्येक शब्द माझे सद्गुरू प. पू. श्री अनिरूध्द लिखित "मातृवात्सल्यविन्दानम्" या परमपवित्र

ग्रंथाचा आधार घेऊनच लिहिलेला आहे. म्हणूनच हे काव्य मी श्री आदिमाता महिषासूरमर्दिनी आणि प. पू. अनिरूध्दांच्या चरणी अंबज्ञतेने  अर्पण  करते.

- डाॅ. प्रिया कर्णिक.

 ॥हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥ ॥नाथसंविध॥